March 30, 2010

मुरलीधर देविदास आमटे ( बाबा आमटे)











मुरलीधर देविदास आमटे या थोर कर्तृत्ववान,  समाजसेवक पुरुषाचा जन्म २४ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणेघाट, वर्धा, चंद्रपूर येथे झाला. बाबांनी केलेले समाजसेवेचे कार्य फार मोठे आहे. तसेच त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या सेवेत दिलेले मोलाचे योगदान हे सुद्धा अतुलनीय आहे. बाबा हे नाव त्यांना  त्यांच्या आईवडिलांनीच ठेवले. समाजसेवेचा वसा बाबांनी लहानपणापासूनच घेतला होता. रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्या कार्याचा आदर्श त्यांनी डोळ्यासामोर ठेवूनच त्यांनी समाजसेवेचे धडे गिरवले.ते ब्राम्हण जहागिरदार  होते. त्या काळी उच्च - निच्च अस भेद केला जात असे. बाबा आमटे यांचे वडील देखील अशाच काहीशा विचारसारणीचे होते.पालकांचा विरोध झुगारून  बाबा आमटे नोकर चाकर मंडळींबरोबर खाणे - पिणे करत असत. त्या काळी निच्च समजल्या जाणार्‍या जाती-जमातीतींल लोकांच्या मुलांबरोबर बाबा अगदी मिळून मिसळून खेळत असत. त्यांनी आयुष्यात स्पृश्य- अस्पृश्य, उच्च - निच्च, लहान - मोठा, आपला -परका असा कोणत्याही प्रकारचा भेद न बाळगता सगळ्यांनाच मदत केली. बालपणापासूनच त्यांच्यात समाजकार्याची ओढ निर्माण झाली होती आणि तेव्हापासूनच त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा पाया त्यांच्याही नकळत रचला गेला.


अंध भिकारी दिसला,बाबांनी त्याच्या वाडग्यात चांदीची नाणी टाकली. त्यांची इतरांना मदत करण्याची समाजसेवक वृत्ती या प्रसंगातूनच दिसून येते. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन वर्धा येथे एक चांगले उत्पन्न मिळवून देणारा वकिली व्यवसाय सुरु केला होता. आपल्या कुटुंबातील अपार संपत्ती आणि राहत्या चंद्रपूर तालुक्यातील ग्रासलेली गरीबी पाहून त्यांना धक्का बसला. हे न बघवल्याने त्यांनी आपल्या संपूर्ण मालमत्तेवर पाणी सोडले आणि सफाई कामगार तसेच मैला वाहून नेणारे कामगार इत्यादिंसोबत काम करण्यास सुरुवात केली. एकदा बाबांनी कोसळत्या पावसात थंडीने कुडकुडणारा एक कुष्ठरोगी पाहिला , त्याचे शरीर बाबांच्याने बघवले नाही ते त्याला तडक आपल्या घरी घेऊन आले आणि तेव्हापासून त्यांचे कुष्ठरोगावरील संशोधन सुरु झाले.. त्याकाळी कुष्ठरोग म्हणजे मागील जन्मीच्या पापाची बाधा अशी समजूत होती. 


त्यांच्या पत्नी म्हणजेच पुर्वाश्रमीच्या साधनाताई गुळेशास्त्री यांना बाबांनी एका लग्न समारंभात वयस्कर नौकराच्या मदतीला लग्न समारंभ सोडून धावून जाताना पाहिले आणि बाबांनी साधनाताईंची हिच मदत करण्याची वृत्ती भावली. तो प्रसंग पाहिल्यावर त्यांना असे वाटले की हीचीच आपण आपली पत्नी म्हणून निवड करावी. म्हणून त्यांनी साधनाताईंच्या आईवडिलांकडे त्यांना मागणी घातली आणि त्यांच्या घरच्यांनीही लग्नाला चटकन होकार दिला व अशा रितीने त्यांचे १९४६ साली लग्न झाले.
 बाबा म्हणत "साधना मला हळद, तुळस मिश्रीत दुध कित्येक वर्षे देत होती तिची अशी समजूत होती की यामुळे मी उजळ होईन आणि मी तिच्याकडे बघून हसलो की ती म्हणायची  अहो, घशासाठी हे किती चांगले औषध आहे." साधनाताई या  आनंदवन आणि कासारवड येथील बाबांनी आयोजित केलेल्या विविध शिबिरांमध्ये हातभार लावयच्या आणि बाबां एवढ्याच तत्परतेने समजसेवा करत होत्या.
लग्न झाल्यावर बाबा आमटेंनी वरोडा गावाबाहेर महारोग आणि कुष्ठरोगांनी ग्रासलेल्यांसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी वरोड्या‍याजवळ  ११ दवाखाने सुरु केले आणि नंतर आनंदवन सुरु केले. आनंदवन येथे पाण्यासाठी ते ४७ अंश सेल्सियस या तपमानात देखील जमीन खणत राहिले. त्यांनी कुष्ठरोगावरील उपायावरील एक अभ्यासक्रम पूर्ण केला इतकेच नव्हे तर त्यांनी कुष्ठररोगावरील जंतू वाढवण्यासाठी स्वतःच्या शरिरावरच प्रयोग केले पण याचा काहीच उपयोग न झाल्यामुळे हे प्रयोग त्यांना नंतर ते बंद करावे लागले.एखाद्या रोगाची चाचणी स्वतःच्या शरीरावार करणार्‍या बाबांच्या धाडसी आणि चिकित्सक वृत्तीचा प्रत्यय मला या प्रसंगातून आला. 
आनंदवन ही त्यांनी उभारलेले कुष्ठरोग्यांसाठीचे घर १९५१ साली अधिकृत करण्यात आले आणि सरकारने त्यांना आनंदवनाच्या विस्तारासाठी काही भूखंडही दिला. यानंतर २ रुग्णालये, १ विद्यापीठ, १ अनाथाश्रम, अंध आणि मूकबधिर मुलांसाठी तसेच तांत्रिकी प्रशिक्षणासाठी १ शाळा इत्यादींची स्थापना या आनंदवनात नव्याने झाली.महारोगी सेवा समितीची स्थापना देखील त्यांनी दरम्याननच्या काळात केली.  पुढे बाबांनी या आनंदवनातील कुष्ठरोग्यांची लग्ने देखील आनंदवनातच लावून दिली, यामुळे कित्येक कुष्ठरोग्यांना संसारसुख तर मिळायच शिवाय अनेक कुटूबांना आधार मिळला. एवढ्यावरच बाबा थांबले नाहीत त्यांनी आनंदवनात शेती सुरु केली आणि अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड तेथील मळ्यांत केली.यामुळे तेथील लोकांना रोजगाराचा एक नवीन मार्गच बाबांनी उघडून दिला. प्रत्येक माणासने स्वकर्तृत्वानेच सगळे काही करायचे आणि मिळवायचे असते ते नेहमी बोलत.



















त्यांनी आनंदवनात देखील अनेक छोट्या संस्था प्रस्थापित केल्या. तेथील कुष्ठरोग्यांना विविध व्यवसाय सुरु करुन दिले.कुष्ठरोग्यांच्या करमणुकीसाठी त्यांनी अनेक वाद्यवृंद, संगीताचे कार्यक्रम देखील राबविले आणि ते आजही त्याच उत्साहाने आणि त्याच जोमाने राबविले जातात.बाबांना कला क्षेत्रात निपुण असलेल्यांसाठी आनंदवनातच कलेचे दालन उघडे करून दिले. अशा हस्तकौशल मंडळींसाठी त्यांनी विविध प्रकारच्या कार्यशाळा भरवल्या.त्यामुळे शिल्पकाम, चित्रकला यांसारख्या कलांमध्ये रसिकता असलेल्यांना त्यांच्या कलेला वाव तर निर्माण झालाच शिवाय स्वंयंरोजगाराचे साधन ही उपलब्ध झाले. बाबा म्हणायचे, "सुख जर वाटलं नाही तर ते संपून जातं" म्हणून त्यांनी नेहमी सुख वाटलं पण दुख कधीच वाटलं नाही. सगळ्यांच्या सुखासाठी झटले बाबा, पण आपल्या सुखाची तमा बाळगली नाही. 
त्यांनी लावलेल्या त्या छोट्याशा रोपट्याचे आता विशाल अशा वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. त्यांचा आश्रम हा सर्व सोयीसुविधांनी सक्षम असा आज आपल्याला बघायला मिळेल आणि या आश्रमामध्ये जवळ जवळ ३००० कुष्ठरोगी गुण्यागोविंदाने नांदत आहेत.  

बाबांनी २  'भारत जोडो' चळवळींची स्थापना केली.पहिली भारत जोडो चळवळ म्हणजे १९८५ सालची काश्मीर ते कन्याकुमारी आणि दुसरी १९८८ सालची आसाम ते गुजरात. या दोन्ही चळवळी स्थापन करण्यामागे शांतता आणि पर्यावरणविषयक जागरुकता ही मुख्य उद्दीष्टे होती. तसेच त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन, सरदार सरोवर आंदोलन आणि वन्य जीवन संरक्षण यांसारख्या इतर काही चळवळींमध्येही सक्रियरित्या भाग घेतला. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या असंख्य पुरस्कारांच्या विक्रीतून आलेले जवळपास १५०० लाखाहूनही आधिक रक्कम  आनंदवन या त्यांच्या संस्थेलाच देण्यात आली. बाबांनी स्वतःसाठी काहीच केले नाही जे काही केले ते समाजासाठी केले. आपल्या गर्भश्रीमंतीला लाथाडून समाजासाठी अहोरात्र झटणारा असा एखादा माणूस आपल्याला कदाचितच बघायला मिळेल.समाजसेवे साठीच बाबा झटले आणि अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवाच करत राहीले. त्यांच्या कर्तबगारीची आणि कार्याची दखल फक्त भारतातीलच नव्हे तर इतर देशांतील बर्‍याच समाजसेवक संस्थांनी आणि बड्या मंडळींनी घेतली.

बाबांना अनेक प्रकारचे पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तबगारीचा सत्कार करण्यात आला. बाबांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे आहे.
 












  •  रॅमन मॅगसेसे पुरस्कार
  • डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका - १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार .
  • संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार १९९८
  • आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका १९८९
  • टेंपल्टन् बहुमान,अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी) १९९०
  • पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर १९९१
  • पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार १९९१
  • राईट लाईव्हलीहूड अवार्ड, स्वीडन - १९९१. (पर्यायी नोबल पुरस्कार) (नर्मदा बचाव आंदोलनासाठी, मेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे).
  • पद्मश्री १९७१
  • पद्मविभूषण १९८६
  • अपंग कल्याण पुरस्कार  १९८६
  • महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुलॆ पुरस्कार १९९८
  • गांधी शांतता पुरस्कार १९९९
  • सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार १९९९
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकार चा सर्वोच्च सन्मान) १-मे-२००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.
  • मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार १९८५
  • पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार १९८६
  • महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार १९७४
  • राष्ट्रीय भूषण पुरस्कार १९७८
  • जमनालाल बजाज पुरस्कार १९७९
  • एन डी दिवान पुरस्कार १९८०
  • राजा राम मोहनराय पुरस्कार १९८७
  • भरतवास पुरस्कार २००८
  • जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार १९८८
  • महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार १९९१
  • कुमार गंधर्व पुरस्कार १९९८
  • जस्टिस् कॆ एस हॆग्डॆ पुरस्कार, कर्नाटक १९९८
  • गौरव डि.लिट् - नागपूर विद्यापीठ १९८०
  • गौरव डि.लिट् - पूणे विद्यापीठ, १९८५-८६
  • देशिकोत्तम (गौरव डॉक्टरेट) १९८८ -विश्वभारती,शांतीनिकेतन, पश्चिम बंगाल 
बाबांनी साहित्य क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले आहे.बाबा आमट्यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत :
  • 'ज्वाला आणि फुले' - कवितासंग्रह
  • 'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)
  • 'माती जागवील त्याला मत'
बाबांनी केलेले समाजसेवेचे कार्य हे अतिशय भव्य स्वरुपाचे आहे. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी बांधलेले आनंदवन हे त्यांच्या मेहनतीचं मूर्तिमंत उदाहरण आहे.असा हा थोर पुरुष दिनांक ९ फेब्रुवारी २००८ रोजी ल्युकेमिआ या आजारावर उपचार घेत असतानाच काळाच्या पदद्याआड गेला...!!! आणि संपूर्ण आनंदवनच नव्हे तर संपुर्ण भारत देशाने एक थोर समाजसेवक गमावला.त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे अंतिम संस्कार अग्नी न देता (हिंदूंप्रमाणे) करण्यात आले आणि त्यांचे पार्थिव पुरण्यात आले. बाबांच्या पश्चात त्यांची दोन मुले डॉ.विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे हे आनंदवनाची ज्योत बाबांच्याच जोमाने तेवत ठेवण्यास हातभार लावत आहेत. आजही बांबांच्या आठवणी आनंदवनात आहेत. तिथल्या लोकांमध्ये ते अजूनही जिवंत आहेत. आनंदवनात वावरताना बाबांचा सहवास  जाणवतो. त्यांनी लिहीलेल्या आणि त्यांच्याच आनंदवनातील शाळेतील मुलांनी म्हटलेल्या "माणुस माझं नाव" य कवितेच्या ओळी कानावर पडल्यावर माझं मन हळवं होतं.त्या ओळी नमूद करण्यापेक्षा आपण या गाण्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ बघुया.
  • "माणुस माझं नाव" या बाबांनी लिहिलेल्या आणि आनंदवनातील मुलांनी गायलेल्या कवितेचा     व्हिडीओ
  •  
बाबा आमटेंच्या समाजसेवेकडे आणि कर्तृत्वाकडे पाहिले, की मला संत तुकारामांच्या अभंगाच्या ४ ओळी येथे आवर्जून लिहाव्याशा वाटतात.
|| जे का रंजले गांजले, त्यांसि म्हणे जो आपुले ||
|| तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा ||














प्रथमेश सुरेश शिरसाट, डोंबिवली

सदर लेख नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" या स्पर्धेसाठी श्री. प्रथमेश सुरेश शिरसाट, डोंबिवली यांनी पाठविला आहे.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

March 28, 2010

कोल्हाट्याचं पोर


जिवनात काहीतरी अर्थपुर्ण करण्याची मनिषा बाळगणार्‍यांना सतत आदर्शांचा शोध असतो. वाचनातून व ईतर माध्यमांतून हा आपला शोध सतत चालू असतो. मराठी माणसाला सहजच एका मराठी माणसाची झेप, त्याचं यश प्रेरणादायी ठरतं. खरंच काही काही माणसे जेवढं काही जगतात ते अत्यंत अर्थपूर्ण जगतात, जगावर आपला ठसा उमटवून जातात व अशा माणसांच्या कर्तुत्वावरुन दृष्टीक्षेप टाकताना आपण प्रेरीत होता. अशाच व्यक्तींमधून एक व्यक्तीमत्व मला अक्षरक्षः भारावून टाकतं - ते म्हणजे "कोल्हाट्याचं पोर" या गाजलेल्या आत्मकथनाचे लेखक डॉ. किशोर शांताबाई काळे - जे दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत.

तमाशात नाचणार्‍या एका स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या या मूलाने अत्यंत कठीण परिस्थीतीत आपलं आयुष्य काढलं. ज्या समाजात बायका कमावतात व माणसं बसून दारु- मटण खातात, अशा समाजात किशोरच्या आईला अत्यंत नरकासमान जिणे आले. तिला शिक्षीका व्हायचे होते, पण तिच्या वडिलांनी तिचे शिक्षण सोडवून तमाशात घातले. वडिलांचा पत्ता नसलेल्या किशोरने पुढे आपल्या नावासमोर आईचं नाव लावलं व हालाखीच्या परीस्थीतीत आपलं शिक्षण बारावीपर्यंत पुर्ण केलं. त्यासाठी त्याने मजूरी केली, कपडे विकले, उधारी पैसे घेतले, अपमान सहन केले, आईपासून दुरावा सहन केला, लोकांचे नाना बोल सहन केले. त्यांचं आत्मकथन वाचताना डोळ्यात पाणी तराळल्यावाचून राहत नाही.

बारावीत किशोरला उत्तम गुण मिळाले. त्याला मुंबईच्या के.ई.एम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षण घेताना आर्थिक विवंचना सहन केल्या. कित्येक वेळा परीक्षेच्या फी चे पैसे मित्राने भरले. असे अनेक हाल सहन करित त्याने आपले एम्.बी.बी.एस पूर्ण केले. किशोर कोल्हाटी समाजातला पहिला एम्.बी.बी.एस डॉक्टर झाला.

अत्यंत हालाखीत वाढलेल्या किशोरने शिक्षण पुर्ण होताच गरीब गरजूंसाठी फिरते उपचारकेंद्र चालवले. ते स्वतः अ‍ॅलोपॅथी शिकलेले असले तरी त्यांचा आयुर्वेदाकडे जास्त ओढा होता. त्यांनी आदिवासी लोकांमध्ये जाऊन वनौषधीचे ज्ञान घेतले. या ज्ञानाचा त्यांनी अत्यंत माफक दरात गरीबांच्या सेवेसाठी वापर केला. त्यांनी जवळपास दिड ते दोन लाख रुग्णांवर मोफत उपचार केले. चिकुनगुनियासारख्या  आजारावर आयुर्वेदिक उपचार शोधून काढले. संपुर्ण महाराष्ट्रभर संत गाडगेबाबा आयुर्वेदिक उपचार केंद्रांद्वारे रुग्णसेवा केली.

आपल्या अल्पशा जिवनात डॉ. काळेंनी साहित्यसेवाही केली. त्यांचं आत्मचरित्र खुप गाजलं. त्याद्वारे कोल्हाटी समाजाच्या दु:ख वेदना समाजासमोर आल्या. समाज ढवळून निघाला. जगात असही जिणं आहे, हे वाचून लोक विस्मीत झाले. पुढे त्यांच्या आत्मचरित्रावर त्याच नावाचा चित्रपटही आला. त्यांनी 'मी डॉक्टर झालो', 'आहार आणि वनौषधी', 'हिजडा- एक मर्द" अशी पुस्तकेही लिहिली. ते शाळांशाळांतून 'व्यक्तीमत्व विकासा'वर भाषणे देत, एकपात्री आत्मकथन सादर करीत, वनौषधींबद्दल बोलत व उपचार करीत. विद्यार्थ्यांना प्रेरणा देत.
त्यांनी समाजाला दाखवून दिलं की  परीस्थीती कितीही बिकट असली तरी त्यातुनही मार्ग काढणारे योद्धे या समाजात आहेत.

आणि........! आपल्या रुग्णवाहिकेद्वारे कुर्डूवाडीकडे येत असताना अचानक टायर फुटून त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि अशा उत्तुंग व्यक्तीमत्वास काळाने आपणांपासून हिरावून घेतले तेही अगदी वयाच्या चौतीसाव्या वर्षी.

अशा या उत्तुंग व्यक्तीमत्वाला या लेखाद्वारे माझे अभिवादन !

श्री मधुर नगराळे
चंद्रपूर


सदर लेख नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" या स्पर्धेसाठी श्री. मधुर नगराळे, चंद्रपूर यांनी पाठविला आहे.



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

March 27, 2010

मला आवडलेलं मराठी व्यक्तीमत्व - प्रभाकरराव


नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" स्पर्धेतील  तृतीय पारितोषिक विजेता लेख


आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. त्यातली कांही प्रसिध्दीच्या शिखरावर जाऊन पोचतात, तर कांही फक्त त्यांच्या परिचयातल्या लोकांनाच माहीत असतात. पण अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रभाव पडत असतो. आमचे प्रभाकरराव ही अशीच एक व्यक्ती आहे. आमच्या पहिल्या भेटीत शिरस्त्याप्रमाणे आम्ही दोघांनी आपण कुठे काम करतो ते सांगितले. पण बोलण्यासारखे इतर असंख्य विषय असल्यामुळे एकमेकांच्या ऑफीसमधे काम, पगार, भत्ते, पदोन्नती वगैरे विषयांबद्दल बोलण्याची आम्हाला कधीच गरज भासली नाही. प्रभाकररावांच्या व्यक्तीमत्वाच्या तानपु-यात अगणित तारा आहेत. त्यातली एकादी तार अचानकच माझ्यातल्या एकाद्या तारेबरोबर जुळायची आणि तिच्या झंकारातून एक प्रकारचा सुसंवाद साधायची असेच नेहमी होत गेले. अत्यंत सुस्पष्ट विचार नेमक्या शब्दात मांडून ते व्यवस्थितपणे समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली असल्यामुळे बहुतेक संवादातून मलाच लाभ मिळायचा.

 प्रभाकररावांचे कार्यस्थळ त्या काळच्या पुण्याच्या विस्तारापासून दूर आडवाटेला होते, त्यामुळे रोजच्या जाण्यायेण्याच्या दगदगीमुळेच सर्वसामान्य माणूस थकून गेला असता आणि "निवांत फावला वेळ कशाला म्हणतात?" असा प्रश्न त्याने विचारला असता. प्रभाकररावांच्याकडे मात्र चैतन्याचा एक अखंड वाहणारा श्रोत असावा. नोकरी आणि इतर जीवनावश्यक कामांसाठी पुरेसा वेळ आणि श्रम खर्च करून उरलेल्या वेळातला थोडा वेळ ते फक्त स्वतःसाठी बाजूला काढून तो साहित्य, संगीत, कला वगैरेंच्या आविष्कारात घालवत. कथा, कविता, विनोद, लेख, संवाद वगैरे विविध प्रकारचे लेखन ते करायचे. त्या काळी फोटोकॉपीची सोय नव्हती. आपल्या मोत्यासारख्या सुडौल हस्ताक्षरात आपल्या लेखनाच्या अनेक सुवाच्य आणि सुडौल प्रती काढून ते पुण्यातल्या नियतकालिकांकडे नेऊन पोंचवत आणि छापून येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत. प्रभाकररावांचे साहित्य कसल्याही ओळखी पाळखीच्या आधाराशिवाय नियमितपणे प्रकाशित होत होते, ही माझ्या दृष्टीने अद्भुत गोष्ट होती.

 आमच्या शाळेतली चांगले हस्ताक्षर असणारी कांही मुले पुस्तकांतली चित्रे पाहून ती हुबेहूब त्यांच्या वहीत काढायची. पण स्वतंत्र चित्रे काढण्यासाठी प्रतिभेचे लेणे लागते. व्यंगचित्र काढायचे असेल तर विलक्षण निरीक्षण, मार्मिकता, विनोदबुध्दी वगैरे इतर अनेक गुण त्यासोबत लागतात. प्रभाकररावांकडे या सगळ्यांचा संगम असल्यामुळे ते आकर्षक व्यंगचित्रे किंवा हास्यचित्रे काढत आणि ती सुध्दा छापून येत. साहित्य आणि चित्रे यांच्या प्रकाशनाच्या निमित्याने झालेल्या परिचयातून त्यांनी संपादन, प्रकाशन वगैरे बाबी पाहून घेतल्या. इतर साहित्यिकांकडून साहित्य मिळवून आणि त्यात स्वतःची भर घालून एक स्वतंत्र दिवाळी अंक काढला आणि कालांतराने तो बंदही केला. मला अशक्यप्राय वाटणा-या अशा कित्येक गोष्टी ते अगदी सहज हातात घेत, त्या यशस्वीपणे पूर्ण करेपर्यंत त्यासाठी कठोर मेहनत घेत आणि त्यानंतर तितक्याच सहजपणे त्या सोडून देत.

 साहित्याच्या क्षेत्रातला एक अभूतपूर्व असा एक नवा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे करून दाखवला. अनेक नव्या कवींच्या अप्रकाशित काव्यरचना गोळा करून त्यांनी त्या आपल्या सुरेख हस्ताक्षरात मोठ्या अक्षरात वेगवेगळ्या ड्रॉइंग पेपरवर लिहून काढल्या, त्यावर समर्पक अशी रेखाचित्रे रेखाटली आणि त्या सर्व कविता मोठमोठ्या आकाराच्या बोर्डांवर चिकटवून पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे चक्क प्रदर्शन भरवले. त्याच्या उद्घाटनासाठी मान्यवरांनी हजेरी लावली, स्थानिक वर्तमानपत्रांत त्याचे वृत्तांत छापून आले आणि रसिक पुणेकरांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. त्यात प्रदर्शित केलेल्या काव्यांची एक पुस्तिकासुध्दा ते दरवर्षी काढत. 'काव्यगंध' या नावाचा हा उपक्रम त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे चालवला. अशा प्रकारची प्रदर्शने नाशिक, नागपूर आदी अन्य शहरात भरवण्याबद्दल विचारणा झाली. परदेशात गेलेल्या मराठी बांधवांनी त्यासंबंधी उत्सुकता दाखवली. विविध प्रकारच्या कवितांचे पोस्टर्स घेऊन आमचे प्रभाकरराव लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिसच्या दौ-यावर गेले आहेत असे एक रम्य चित्र मला दिसायला लागले होते. अखेर हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 'काव्यतरंग' या नांवाने भारतातच झाले. त्यासाठी परदेशस्थ कवींनी आपल्या रचना ईमेलद्वारे इकडे पाठवणे अधिक सोयिस्कर झाले असावे.

 जितक्या सहजपणे प्रभाकररावांची बोटे कागदावर चालून सुरेख अक्षरे किंवा चित्रे काढतात तितक्याच कौशल्याने ती हार्मोनियमच्या पट्ट्यांवरून फिरून त्यातून सुमधुर अशी नादनिर्मिती करतात. संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण न घेताच एकलव्याप्रमाणे एकाग्रचित्ताने साधना करून त्यांनी आपले वादनकौशल्य कमावले आहे. कुठलीही लकेर ऐकल्यावर ते पहिल्याच प्रयत्नात ती तशीच्या तशी पेटीतून काढतात. ओळखीचे चार संगीतप्रेमी भेटले आणि त्यांची मैफल जमली की कसलेही आढेवेढे न घेता ते पेटीवर बसतात, गाणारा कुठल्या पट्टीत गाणार आहे वगैरे चौकशी न करता त्याची पट्टी अचूक पकडतात आणि कोमल ऋषभ किंवा शुध्द निषाद असली चर्चा न करता त्याच्या गाण्यात आपले रंग भरतात. एकाद्या दर्दी गायकाने काळी चार किंवा पांढरी पांच अशा विशिष्ट पट्टीतले सूर मागितलेच तर त्यातील षड्ज आणि पंचम दाखवून ते त्याचे गाणे सुरू करून देतात आणि त्यालाही उत्तम साथ करतात.

 कांही वर्षांपूर्वी एकदा ते हिमालयातल्या एका दुर्गम अशा जागी गेले असल्याचे ऐकले. त्यांच्या बोलण्यात कधी गिर्यारोहणाचा उल्लेख आला नव्हता. त्यातून ते ऑफीसतर्फे तिकडे गेले असल्याचे समजल्यावर मी अधिकच गोंधळलो. समुद्रसपाटीपासून खूप उंचावर असलेल्या जागी जे अतीशीत आणि विरळ वातावरण असते त्याचा सैनिकांच्या सामुग्रीवर काय परिणाम होतो अशा प्रकारच्या कसल्याशा अभ्यासासाठी गेलेल्या तज्ज्ञांच्या समीतीमध्ये त्यांचा समावेश होता असे नंतर समजले. साहित्य, संगीत, कला वगैरेमध्ये रमणारे हे गृहस्थ उच्च दर्जाचे शास्त्रीय संशोधनाचे कार्य करत होते हे मला माहीतच नव्हते.

प्रभाकरराव सेवानिवृत्त होणार असल्याचे समजल्यावर ते साहित्य आणि संगीताच्या क्षेत्रात कांही भरीव स्वरूपाचे प्रकल्प हातात घेतील असे मला वाटले होते. ते एकादा मोठा ग्रंथ लिहून त्याचे प्रकाशन करतील, संगीत नाटक रंगमंचावर आणतील, कविता, चुटकुले आणि चित्रे यांची प्रदर्शने वेगवेगळ्या शहरात भरवतील, विविधगुणदर्शनाचे कांही अफलातून कार्यक्रम सादर करतील, होतकरू विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा सुरू करतील अशा कांही कल्पना माझ्या मनात आल्या. पण त्यांनी मनात बाळगलेले काम माझ्या कल्पनेच्या अत्यंत स्वैर भरारीच्या पार पलीकडले होते. एका खेड्यात एक जमीनीचा पट्टा घेऊन त्यात स्वतः काबाडकष्ट करून मातीतून मोती पिकवायचे त्यांनी ठरवले. जमीनीची नांगरणी करण्यापासून ते आलेल्या पिकांची कापणी व मळणी आणि झाडांची लागवड करण्यापासून फळांची व भाज्यांची वेचणी इथपर्यंत सारी कामे त्यांनी स्वतःच्या हाताने केली, वेगवेगळ्या प्रकारची बीबियाणे, खते, कीटकनाशके वगैरेंचा उपयोग करून पाहिला आणि या सर्वातून एक वेगळ्याच प्रकारच्या निर्मितीचा आनंद लुटला आणि तितक्याच सहजपणे हा छंदसुध्दा सोडूनही दिला. त्यावर अत्यंत शांतपणे त्यांनी सांगितले की शेती करावी किंवा न करावी या दोन्ही बाजूंना पहिल्यापासून परस्परविरोधी अनेक कारणे होतीच. आधी पहिली बाजू जड होती म्हणून मी तसा निर्णय घेतला होता, त्यानंतर तिकडची कारणे हलकी होत गेली आणि दुसरीकडची वजनदार होऊन पारडे उलट बाजूने झुकल्यावर तो बदलला.

 पण त्यानिमित्याने त्यांचे वनस्पतीविश्वाशी जडलेले नाते मात्र तुटले नाही. त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवरच छोटीशी किचन गार्डन तयार केली. दुधाच्या पिशव्यांना बारीक छिद्र पाडून ठिबकसिंचनाचे प्रयोग केले, त्या बागेत लावलेल्या रोपांसाठी सेंद्रिय खत निर्माण करण्याविषयी त्यांचे आगळ्या प्रकारचे संशोधन चालले आहे. मिळेल तो पालापाचोळा गोळा करून ते आपल्या गच्चीवर बसवलेल्या सोलर कुकरमध्ये चांगला शिजवून घेतात आणि त्याचा लगदा थोड्या मातीत मिसळून झाडांच्या मुळापाशी घालतात आणि त्यावर मातीचा थर पसरवतात. त्यामुळे झाडांची जोमाने वाढ होते. किती मातीमागे किती दिवसांनी किती लगदा घालायचा याचे ऑप्टिमायझेशन ते करत आहेत.

 परवा त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतांनाच आम्ही टेलिव्हिजनवरील बातम्या पहात होतो. मध्येच "मी एका मिनिटात येतो" असे सांगून प्रभाकरराव उठून आत गेले आणि बाहेर आल्याआल्या त्यांनी सांगितले, "अमक्या अमक्या कंपनीचा भाव साडेअठ्याहत्तर झालेला टीव्हीवर पाहिला म्हणून तिचे शंभर शेअर विकून आलो." मी अचंभ्याने आणि भाबडेपणाने त्यांना विचारले, " अहो इथे तर हजारो कंपन्यांचे भाव स्क्रोल होतांना दिसत आहेत, त्यातली नेमकी हीच कंपनी तुम्ही कशी निवडली?" त्यांनी त्यावर सांगितले, "मी याचा सखोल अभ्यास सुरू केला आहे." अनेक कोष्टकांनी भरलेली एक वही दाखवून त्यांनी पुढे बरेच कांही सांगितले, पण ते माझ्या डोक्यावरून चालले होते.

अशा खूप छोट्या छोट्या गंमती माझ्या आठवणीत आहेत. त्या प्रत्येकात आश्चर्यचकित होण्याची पाळी माझ्यावरच आली होती. नव्या भेटीत प्रभाकररावांचे कोणते नवे रूप समोर येईल याचा विचारच मी आता करत नाही. त्यामुळे आता आश्चर्य वाटणे जरा कमी झाले आहे. मात्र त्यांची आठवण निघाली की दर वेळी बोरकरांची एक ओळ मला आठवते, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती."

आनंद घारे, नवी मुंबई

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

March 25, 2010

मला आवडलेलं मराठी व्यक्तीमत्व - डॉ. श्रीधर राजगुरु आणि सौ. अनिता राजगुरु



नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक विजेता लेख


महाराष्ट्र बालकुमार संमेलनाच्या समारोप जवळ आला. नुसते वंदेमातरम न म्हणता एक अप्रतिम कार्यक्रम सादर झाला. साहित्यीकांच्या हातातल्या मेणबत्तीच्या ज्योतीवर सर्व कार्यक्रमातल्या मुलांनी ज्योत पेटवली आणि ही ज्ञानज्योत भारतभर नेली म्हणजेच प्रातिनिधिक स्वरुपात मंचावर नकाशा ह्या मेणबत्त्यांनी उजळला. एका कोपर्‍यात तिरंग्याच्या तीन रंगांचा ओढण्या घेतलेल्या मुलींनी ३ ओळीत उभं राहुन अशी हालचाल केली की झेंडा वार्‍यावर लहरतोय असा भास झाला. मागे वंदेमातरमचा ईतिहास, त्याची महती सांगणारं निवेदन, हा समारोप इतका उत्कट होता की मंडपातला प्रत्येकजण देशप्रेमाने प्रेरीत झाला. ह्या कार्यक्रमाचे सूत्रधार, संकल्पक कोण ? तर ते होते डॉ. श्रीधर राजगुरु आणि सौ. अनिता राजगुरु (आण्णा आणि काकू)

आण्णा आणि काकू हे माझ्या सुनेचे सख्खे मोठे काका-काकू. आपल्या आजुबाजुला वावरणारी माणसं एवढी मोठी, अफाट ज्ञानी आणि एका ध्येयाने प्रेरीत होउन त्यासाठी झटणारी असतात हे त्यांच्या जेव्हा संपर्कात येतो, जवळ येतो तेव्हा त्यांचं मोठेपण प्रकर्षाने जाणवतं. त्यामागचे त्यांचे कष्ट, शिक्षणाच्या द्वारे नाटकांच्या द्वारे , शिबिरांच्या द्वारे , खेळांच्या द्वारे व्यक्तीमत्व विकास या सार्‍याची तळमळ अधिक जाणवू लागते. एकाच ध्येयाने झपाटून गेलेली ही जोडी लहानग्यांत जशी प्रसिद्ध आहे तशीच नाट्यप्रेमी जगतातही आहे.

आण्णांचं मूळ आडनाव ब्रम्हे. कर्‍हाड जवळच्या सासवड या गावी त्यांचे पुर्वज कचेश्वर महाराज रहात. दुष्काळाच्या वेळी ते गरुडासनात दीड दिवस उभे राहिले, धो धो पाऊस पडला म्हणून शाहूमहाराजांनी त्यांना गावं इनाम दिली आणि राजगुरु हा किताब दिला. भगतसिंग, सुखदेवांचे सहकारी राजगुरु हे अण्णांचे काका.

अशी थोर पार्श्वभुमी त्यांना लाभली. पण ते रमले लहान मुलांच्यात. आण्णांनी दुसरीत असताना शाळेच्या नाटकात वक्रतुंडाची भुमिका केली जिथून त्यांचे रंगभुमीवर आगमन झाले. त्यांनी लहान मुलांसाठी "चिल्ड्रन थीएटर" चालु केलं. संगीतचंद्राचे वरदान, अटकम पिटकम छिन्नुक छिट्या, आजीची छडी गोडगोड छडी, पुस्तक हंडी, चंद्र हवा- चंद्र हवा अशी अनेक नाटके दिग्दर्शीत केली. मोठ्यांसाठी ज्योती, सोनेरी चौकट, स्वामी, काका किशाचा, कुलवधु, तीन चोक तेरा अशी १२ नाटके  दिग्दर्शीत केली.

१९६५ मध्ये अण्णांचं लग्न झालं आणि सौ. अनिताकाकूंनी पण स्वतःला त्यांच्या कार्यात झोकुन दिलं. अण्णा एम.ए., एम्.एड्,डी पी एड, पी.एच्.डी. तर काकू एम.ए, एम.एड, डी.पी.एड असा समसमा संयोग. नाट्यप्रेमींच्या जेवणखाणांचं बघता बघता काकू एकीकडे पी.ई.एस गर्ल्स स्कूल, पुणे येथे सुपरवायझर म्हणून नोकरी करत होत्या."शब्दांच्या जाती परीचयातून वाक्यरचनेकडे " या निबंधांला त्यांना अखिल भारतीय पुरस्कार मिळाला. त्यांनी दूरदर्शनसाठी लेखन, गीतापरीवारासाठी वर्तमानपत्रातील कात्रणांच्या चिकटवह्या केल्या. नाट्यवाचन स्पर्धेत बक्षीसे, त्यांचे शिशुरंजनतर्फे आयोजित व्यक्तीमत्व विकास व नाट्य शिबिरांचे संचलन १९६७ पासून आजतागायत चालू आहे. अनुत्तीर्ण मुलींसाठी ईंग्रजीचा प्रकल्प काकूंनी राबवला, तो इतका यशस्वी झाला की श्री अमरेंद्र गाडगीळांनी (ईंडीयन इन्स्टीट्युटचे) दिल्लीला पाठवला व त्यास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अशा ह्या आण्णांच्या अर्धांगिनीने काकूंनी २८ पुस्तके लिहीली.

१९८८ साठी आण्णा नवरोसजी वाडीयामधुन सेवानिवृत्त झाले आणि दोघेही दुप्पट उत्साहाने कामाला लागले. त्यांना वाढत्या वयाचा व काकूंना कर्करोगाचा कधीही अडसर वाटला नाही. २००२ मध्ये बालदिनी आण्णा शाळेत न जाणार्‍या मागासवर्गीय मुलांना (ज्यांनी गाडीपण पाहिली नव्ह्ती) घेऊन दिल्लीला गेले. वाजपेयींच्या समोर मुलांनी वंदेमातरम असं सादर केलं की अटलजींच्य डोळ्यात पाणी आलं.

संगमनेरचे तरुण उद्योजक व पुढची भावी पिढी सुसंस्कृत होण्यासाठी धडपडणारे संजय मालपाणी या दोघांना संगमनेरला घेऊन गेले. "भारताचं भविष्य मुळीच दारुण नाही. खेड्यापाड्यातून कार्यकर्ते ताकदीने कार्य करीत आहेत हे पाहून उत्साह येतो." असं दोघांच म्हणंण आहे. विविध स्पर्धा घेऊन मुलांना टी.व्हीच्या व्यसनापासून लांब ठेवता येतं.

१९६९ मध्ये आण्णांची शिशुरंजन संस्था स्थापन झाली आणि फक्त नाटक हे उद्दीष्ट न राहता व्यक्तीमत्व विकास करण्याचं व्रत त्यांनी घेतलं. १९५२-७३ या काळात पी.डी.ए. या सुप्रसिद्ध संस्थेत आण्णा कार्यरत होते.
 वेड्याचे घर उन्हात , प्रेमा तुझा रंग कसा?, तू वेडा कुंभार अशा अनेक नाटकांचे भालबा केळकर दिग्दर्शक होते आणि आण्णा रंगमंच व्यवस्थापक. "तू वेडा कुंभार" साठी उत्कृष्ट नेपथ्याचा राज्यपुरस्कारही त्यांना मिळाला. नेपथ्य खरे वाटावे म्हणून काकूंनी शेणाने भिंतीपण सारवल्या.

२५ मार्च १९७३ या दिवशी पी.डी.ए मधून विभक्त व्हावं लागल्याने मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर आणि आण्णा या मंडळींनी थीएटर अ‍ॅकॅडमी ही संस्था स्थापन केली व इतिहास घडविणार्‍या "घाशीराम कोतवाल" ची मुहुर्तमेढ रोवली. ह्या चर्चा, वादळं, जेवणं आण्णांच्या घरीच चाले कारण संस्थेला वेगळी जागा नव्हती. १० बॅगा घेऊन ही मंडळी जगभर हिंडली. "घाशीराम्"चे निर्मीती व्यवस्थापक असलेले आण्णा पुन्हा शिशुरंजन शिबिरात रंगून गेले. या नाटकासंदर्भात मधु अभ्यंकर लिहितात "पुण्याचा वामन हरी, साहेबदेशी धमाल करी !" जर्मनी व फ्रांन्सचे रसिकही या नाटकावर खुष होते.

१४.११.२००३ रोजी सोलापुरात बालशिक्षण परीषदेच्या दहाव्या राज्यव्यापी अधिवेषनाचे उदघाटन आण्णांच्या हस्ते झाले. ते म्हणतात, "जो चांगले मूल होऊ शकतो तोच चांगला शिक्षक होऊ शकतो".
आण्णांनी प्रोग्रेसीव्ह ड्रॅमॅटीक असोसिएशन, थीएटर अ‍ॅकॅडमी सारख्या संस्थात संस्थापक व कार्यवाह म्हणून  काम केलं. "मराठी बालरंगभूमी संहिता व प्रयोग दर्शन" ह्या विषयांवर प्रबंध लिहिला व त्यांना १९९१ मध्ये PHD मिळाली. अनेक चित्रपटांतून कामे केली, नाटकातून भूमिका केल्या. उंबरठा, गंगाकाठ, गंगेत घोडे न्हाले, अंगुठा छाप ह्या मराठी, हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन सहाय्याचे काम केले. अनेक शिबिरं, अनेक मेळावे, वंदेमातरमचे दृष्याविष्कार सादर केले. अजूनही वयाच्या ८२ व ८० व्या वर्षी दोघेही "अथश्री"त दासबोध वाचन, कार्यक्रमांचे आयोजन, चित्रासहित दिनविषेश सादर करतात. दोघांचही काम एवढं मोठं आहे कि लिहावं तेवढं कमीच आहे. दुधात साखर विरघळावी तसं हे दोघांच अतूट नातं.

या सगळ्याची जाणीव ठेवून २८ ते ३१ जानेवारी २०१० ला संगमनेर येथे झालेल्या २२ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात "जीवन गौरव पुरस्कार"  देउन आण्णांना गौरविण्यात आले. सकाळचे संपादक सुरेशचंद्र पाध्ये म्हणतात, " लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, चित्रपट ह्या क्षेत्रातील त्यांचे काम धडाकेबाज आहे".

अशा या जोडीला माझ्या लाख लाख शुभेच्छा !

नीला सहस्रबुद्धे, पुणे 


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

March 23, 2010

Earth Hour 2010 - "Switch off"
















वर्ल्ड वाइल्डलाइफ फेडरेशनने (WorldWildlife Federation - विश्व वन्यजीव संगठना) "दिवे विझवा" (switch offlights) नावाची एक मोहीम हाती घेतली आहे. ग्लोबल वॉर्मींगचे पृथ्वीवर होणारया दुष्परीणामांची सामान्य जनतेस जाण व्हावी म्हणुनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जगभरातील ८५ देशांमधल्या तब्बल ८०० शहरांमधील नागरीक २७ मार्च २०१० ला रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान विजेवर चालणारे सर्व दिवे आणि उपकरणे बंद ठेवणार आहेत.
याबाबत अधिक माहीती जाणून घेण्यासाठीwww.earthhour.in या वेब साइट्ला भेट द्या. खाली दिलेला हा व्हीडीओ पण अतिशय रंजक आहे.



टिप - हि माहीती देणारी एक ई-मेल सर्वत्र पाठविण्यात येत आहे. कदाचीत तुम्हाला आधीपासूनच याची माहीती असेलही. मात्र तरीही मी हा पोस्ट लिहित आहे कारण हा लेख वाचून जर एका माणसाने देखिल एक तास दिवे बंद ठेवुन पर्यावरणरक्षणाच्या या कार्याला हातभार लावला तरी  मी या पोस्टला यश मिळाले असे समजेन.
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

March 22, 2010

How "Google street View" works?

Phishing attacks - Explained in plain English

Time lapse video - One year in one minute

मला भावलेले व्यक्तिमत्व- आद्य कवियित्री महदाइसा


नेटभेट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेता लेख

कोणत्याही समाजाची समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची  परिस्थिती कशी आहे यावरून ठरते.ती परिस्थिती जाणून घेण्याचे उत्तम साधन म्हणजे त्या समाजाचे वांड्गमय होय. महाराष्ट्रातील मौखिक वांड्गमयापासून ते लिखित वाड्मयापर्यंतचा आढावा घेतला तर स्त्री जीवनाची स्थित्यंतरे सहज लक्षात येतात. मौखिक वांड्गमयाचा विचार केल्यास कहाण्या व लोककथा या प्रकारांमधून स्त्री विविध रूपातून प व्यक्त होत गेलेली दिसून येते. परंतु ही व्यक्तता स्वतंत्रतेचा वेगळा ठसा देखील उमटवीत गेल्याचे लक्षात येते. उदाहरणच द्यायचे झाल्यास सोमवारच्या खुलभर दुधाच्या कहाणीतील राजाच्या दवंडीचे उल्लंघन करणारी म्हातारी , किंवा शुक्रवारच्या कहाणीतील श्रीमंत भावाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी बहीण या दोन्ही स्त्रियांचे देता येईल. या दोन्ही स्त्रिया परंपरेचे टोक धरुनच स्वतंत्र अस्तित्वाची बीजे पेरतांना दिसून येतात.

लिखित स्वरूपातील वांड्गमयाचा विचार करतांना वेदकालीन स्त्रिच्या जिवनाचा आलेख पुरुषांना समांतर असा होता. वेदकालीन स्त्रीजीवन समृध्द होते, पुरुषांप्रमाणेच स्त्रिला स्वतंत्र बौध्दिक वा आध्यात्मिक जीवन होते. शिक्षणात , यज्ञकर्मात, तिला स्वतंत्र स्थान होते. म्हणूनच उर्वशी ,अपाला, सूर्या, गार्गी इत्यादी तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या.सूत्रकालात स्त्रियांचा दर्जा हीन झाला याची असंख्य कारणे देता येतील त्यात प्रामुख्याने राजकीय स्थित्यंतर हे होय. धर्मशास्त्रांत पुरुषांना प्राधान्य मिळाल्याने स्त्रिया बंधनात अडकल्या, स्त्रीजीवन संकुचित झाले, त्या परावलंबी झाल्या . या सर्व पार्श्व भूमीवर इ.स. १३०० मध्ये उदयास येणारी आद्य संत कवयित्री महदाइसा किंवा महदंबा हे मला आवडलेले व्यक्तिमत्व होय.

मराठीतील पहिले स्त्री रचित काव्य  ’धवळे’ हे असून याची रचनाकार महदाइसा असल्याने आद्य कवयित्रीचा मान तिला मिळतो. महदाइसेचे कर्तृत्व , मोठेपण समजून घेण्यासाठी तत्कालीन समाज परिस्थिती , समाजातील स्त्रीचे स्थान तसेच स्त्री जिवन समजून घेणे आवश्यक ठरते. यादवकालात एकेश्वरी वादाचा पुरस्कार करणाऱ्या पंथाचा म्हणजेच महानुभाव पंथाचा उगम झाला. या पंथाचे पंचकृष्ण म्हणजेच श्रीकृष्ण , श्री दत्तगुरू, चांगदेव राऊळ, श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधरस्वामी यांनी या संप्रदायाची धुरा वाहिली. श्री चक्रधर स्वामींच्या कालखंडात खऱ्या अर्थाने ह्या संप्रदायाचा प्रसार व प्रचार झाला.

हिंदू धर्मातील कर्मठपणा, कर्मकांडे, जातीय विषमता इत्यादी अनेक बाबींपासून सुटका करून घेण्यासाठी सर्वसामान्यांनी या पंथाचा स्वीकार केला. श्री चक्रधर स्वामींचे शिष्यत्व पत्करलेल्या अनेक महानुभावीयांनी पंथीय अभिमानातून व स्वामी भक्तीतुन लेखन केले. हे लिखाण सामान्य जनांच्या भाषेतूनच व्हावे असा चक्रधरस्वामींचा आग्रह होत आणि यातूनच मराठीतील आद्य ग्रंथांची निर्मिती झाली. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान सांगणे , श्रीकृष्ण जन्माचे तसेच विवाहाचे सोहोळे सांगणे, श्रीकृष्ण भक्ती हे विषय त्यांच्या  ग्रंथलेखनाचे विषय होते. ’लीळाचरित्र’ ,’ गोविंदप्रभू चरित्र’ ,’ सैह्याद्रिवर्णन’, ’वछाहरण’, ’सूत्रपाठ’,  ’धवळे’ हीच ती  ग्रंथनिर्मिती होय.

या पैकी केशिराज बास  किंवा केसोबास यांनी संपादित केलेले ’सूत्रपाठ’ व ’दृष्टान्त पाठ’ यातून तात्कालीन समाजजीवनाचे दर्शन घडते. मुळात दृष्टान्त हा अलंकाराचा प्रकार होय. एखादे तत्त्वज्ञान सहजपणे समजावून सांगण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तत्कालीन समाजजीवनात स्त्रीच्या पातिव्रत्याच्या कल्पनेला विशेष महत्व होते. आपल्या स्त्रीवर नजर ठेवणारे पती, आवडती नावडती पत्नी असा भेदाभेद, विधवा व परित्यक्ता स्त्रियांची दयनीय अवस्था ह्या सर्व गोष्टी या दृष्टान्त पाठातून ठळकपणे  दिसून येतात. उदा. ’इसाळुवाचा दृष्टान्त’ (इसाळू = संशय घेणारा)’द्विभार्या दृष्टान्त’, ’पतिव्रतेचा दृष्टान्त’, ’शय्यापालनेचा दृष्टान्त’ ही याची सर्वोत्तम उदाहरणे  आहेत. एकूण काय, तर स्त्री आणि तिची विविध रुपे आपल्याला दिसतात. स्त्री -जीवनाच्या अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर महदाइसा हिचे करतृत्व  विशेष प्रकारे उठून दिसते.

महदाइसाचा जन्म एका विद्वान घराण्यात झाला. तिचे पणजोबा वामनाचार्य हे यादवराजांचे आश्रित असून पणजी महदाइसा विद्वान होती. पणजीला म्हाळसा प्रसन्न होती. पणजी महादेवरायाची पुरोहित असल्याने राजा तिला नित्य प्रश्न विचारीत असे व ती भविष्य सांगत असे. एका वादात तिने परप्रांतीय विद्वानांचा पराभव केल्याने तिला जैतपत्र मिळाले. राजाने पाच गावे इनाम म्हणून दिली. अशा विद्वान पणजीचा वारसा चालवणारी विद्वान नात महदाइसा होय. महदाइसाचा जन्म वायेनायक व कामाइसा ह्यांच्या पोटी झाला.

बालपणीच वैधव्य आलेली महदाइसा त्या काळच्या प्रथेनुसार माहेरी येते. माहेरी तिला प्रतिष्ठा असते. तिच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ’माझ्या विना घरचे काहीच चालत ना, घरचे करणे सवरणे मीच करी! ’महदाइसा ला चुलत बहीण भावंडेही होती. त्यातले नागदेव हे पुढे तिचे गुरु झाले.  महदाइसेच्या व्यक्तिमत्वाचा शोध हा चार ग्रंथातून घेता येतो. ’लीळाचरित्र’, ’श्री प्रभुचरित्र’, ’स्मृतीस्थळ’ व ’धवळे’ या ग्रंथांमधून  तिची प्रतिमा दृष्टीस पडते.  तीर्थयात्रेस जाणे ,व्रतवैकल्य करणे, देवपूजेत रमणे या रुढ परमार्थाच्या वाटेने जाणे तिला आवडत असे. सुरुवातीच्या काळात चक्रधर स्वामींचे शिष्य दादोस हे तिचे गुरु होते. यांच्या कडूनच नागदेवाला व महदाइसाला श्री चक्रधरस्वामींचे मोठेपण कळते नागदेवाला चक्रधरस्वामींचे नांव कानी पडताच स्थिती प्राप्त होते( म्हणजेच दर्शन घडते) परंतू श्री चक्रधर्स्वामीचे दर्शन घडूनही महदाइसेने मात्र चटकन शिष्यत्व पत्करले नाही  . तिच्या स्त्री मनाने जणूकाही गुरुची परिक्षा घेण्याचे ठरवले होते. आणि इथेच महदाइसच्या कर्तुत्वाचे , मोठेपणाचे ,वेगळेपणाचे दर्शन घडते.

श्री चक्रधरस्वामींनी आपल्या पंथात समानतेवर भर दिला. स्त्री,शूद्रांना त्यांच्या पंथात प्रवेश होता. त्यामुळेच चक्रधरस्वामी हे आद्य कृतिशिल  सुधारक ठरतात. अशा स्वामींचे शिष्यत्व महदाइसेने विचारपुर्वक पारख करुनच स्वीकारले होते. महानुभाव पंथाचा सर्वश्रेष्ठ संन्यास मार्ग ती स्वीकारते. महदाइसेचे वडील याला विरोध करतात परंतु ती आपल्या ठाम निश्चयापासून दुरावत नाही. महानुभावावे अत्यंत खडतर असलेले भिक्षाव्रत ती स्वीकारते. या व्रतानुसार हाताच्या ओंजळीत मावेल एवढेच अन्न भिक्षा म्हणून स्विकारायचे व ते अन्न नदीच्या काठी जाउन , नदीकडे तोंड करुन प्राशन करायचे व पाणी प्यायचे. वैराग्यवृत्ती मनोनिग्रह या गुणांमुळेच ती हा खडतर प्रवास पार करू शकली. श्री चक्रधर स्वामींवर तिची नितांत श्रध्दा आहे. त्यांच्या प्रत्येक विचाराला तत्वज्ञानाला अनुसरणारी ती आदर्श शिष्या होते. श्री चक्रधर स्वामींना आपले जीवन ती समर्पित करते. परंतु इथे हे समर्पण परमार्थाच्या भक्तीतून आले असल्याने त्याला आध्यात्माचा रंग चढला आहे.

स्वतंत्र वृत्ती, कुशाग्र बुध्दी असलेली महदाइसा ही आपल्याला लीळाचरित्रात भेटते. श्री चक्रधरस्वामी गेल्यानंतर त्यांच्या लीळेचे वर्णन करण्यासाठी लीळाचरित्राची निर्मिती झाली . या लीळांमधे प्रामुख्याने श्री चक्रधरस्वामींना जिज्ञासा व बुध्दिमत्तेच्या जोरावर प्रश्न विचारून  हैराण करणारी महादाइसा भेटते.’ म्हातात्री चचकः, म्हातारी विसासकः एथ निरंतर काहीतरी पुसतचि असे’  असे उदगार स्वमी तिच्या बद्दल काढतांना दिसतात, त्याच वेळी तिच्या विचक्षण बुध्दिची साक्ष पटते. दोघांच्या संवादातून प्रश्नोत्तरातून पंथाची माहिती आपल्याला मिळत जाते. अशा महदाइसाशी संवाद साधताना चक्रधर मनापासून रमतात, म्हणूनच ती त्यांच्या मर्जितील , अंतेवासी शिष्या होते.

चक्रधरांचे तत्त्वज्ञान नीट समजून न घेतल्याने त्यांना अवयव विच्छेदनाची शिक्षा होते. पैठणचे विद्वान त्यांना पकडून घेउन जातात . आपल्या अवतार  कार्याची समाप्ती होत आहे अशी जाणीव चक्रधरांना होते व पंथाची धुरा नागदेव व महदाइसा या दोघांच्या खांद्यावर देतात. महदाइसा आपले संपूर्ण जीवन स्वामींच्या चिंतनात व पंथाच्या कार्यासाठी समर्पित करते. श्री चक्रधर स्वामींच्या चिंतनाच्या याच काळात’ धवळ्या ’ची रचना झाली.  धवळे  , मातृकी, रुकमिणी सैवंर, गर्भकांड ओव्या, आरती अशी महदाईसाची  वांड्गमय निर्मिती होय. यातील धवळ्यात भेटणारी कवयित्री महदाइसा मला विशेष आवडते. श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या विवाह कथेकडे महदाइसा आकर्षित झालेली दिसते. रुक्मिणीच्या मनातील भक्तीभाव हा तिला विलक्षण वाटला. किंबहुना तिचे चक्रधरस्वामिंशी असलेले गुरु शिष्याचे नाते ती या धवळ्याद्वारा व्यक्त करताना दिसते.अशा प्रकारे रुक्मिणी स्वयंवराची कथा ही तिला आद्य कवियित्रीचा मान मिळवून देणारी ठरली. श्री चक्रधरांनी श्री कृष्णचरित्र ७१ प्रसंगात वर्णन केले आहे. त्याचेच श्रवण मनन व चिंतन करून धवळ्याची निर्मिती झाली आहे. श्री चक्रधर स्वामींचा वियोग तिला सहन झाला नाही. श्री चक्रधरांनी जाण्यापूर्वी महदाइसाला ’असंन्निधान धर्म’ सांगितला होता. ’असंन्निधानी तळमळ..... पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये. अखंड जळतचि असे’ अशिच विरहात जळणारी रुक्मिणी महदाइसेने आपल्या काव्यातून प्रकट केली .

श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेल्या आचारधर्माचे  काटेकोरपणे पालन करीत ती संन्यासिनी , धवळे कर्ती कवयित्री प्रसंगी पंथात आईची भूमिका पार पाडणारी,’कोण देहाते सांभाळी’ या अवस्थेला पोचणारी ज्ञानवान तपस्विनी आहे. अखेरच्या काळात चक्रधरांच्या शिकवणुकीप्रमाणे शारीरिक व्याधी जडली असतांना देखील औषधांना नकार देते.शेवटी नागदेव सुध्दा त्यांचे मोठेपण मान्य करतात.

नागदेव तिला विचारतात ’रुपै देव आठवतो’ ती म्हणते ’हो नागदेवा आठवतो’ नागदेव म्हणतात कैसा?  ती म्हणते ’वजरी घडिता’ हे वजरी घडिता  चक्रधरस्वामींचे रूप तिच्या ठायी चिरंतन वसलेले असते. ’रुपै देह’ पर्यंत उचित स्मरणा चुकवीशीः पहिल्या दिवसापासोनी सेवटील दिसापर्यंत देतो तुवाचि धरला असे’ अशी कबुली नागदेव देतात तेंव्हाच महदाइसेचे मोठेपण लक्षात येते.

स्त्री जीवनाचा खरा अर्थ दाखवून देणाऱ्या काही स्त्रियांपैकी एक म्हणजेच महदाइसा अथवा महदंबा होय. तिचे जीवन एक   मानबिंदू ठरतो. या पंथाने स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग मोकळा करून दिला त्याचा फायदा घेउन परमोच्च स्थान प्राप्त करणारी महदाइसा ही आद्य कवियित्री म्हणून मानाचे स्थान प्राप्त करते. आजच्या कवितांमधून तिने पेरलेली काव्याची बीजे प्रतित होतांना दिसतात. तेंव्हा अभिमानाने उर भरुन येतेओ. जीवनातील प्रतिकूलतेवर मात करीत आत्मभानाने जागृत होणाऱ्या ,आध्यात्माची कास धरीत मुफ्तीचा खडतर मार्ग स्वीकारणाऱ्या महदाइसाला माझा मानाचा मुजरा!

सुपर्णा कुलकर्णी
मालाड पूर्व
मुंबई-४०००९७


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails